Tuesday, November 5, 2019

जम्मू-कश्मीर आणि लद्दाख: हिमालयाच्या अल्याड-पल्याड

जम्मू-कश्मीर आणि लद्दाख: हिमालयाच्या अल्याड-पल्याड

दिनांक 31 ऑक्टोबर 2019 या दिवशी भारत सरकारने जम्मू आणि कश्मीर या राज्याचं व्दिभाजन झाल्याचं जाहीर केलं आणि "जम्मू आणि कश्मीर" आणि "लद्दाख" हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. दोन दिवसांत गृह मंत्रालयाने नकाशे प्रसिद्ध केले आणि हे केंद्रशासित प्रदेश "नक्की कसे असतील" हे स्पष्ट झालं. नीट बघितलं तर लक्षात येतं की जम्मू-कश्मीर आणि लद्दाख म्हणजे हिमालयाच्या अल्याड-पल्याड!

द्विभाजनापूर्वीचं जम्मू आणि कश्मीर राज्य (आपण त्याला "जम्मू-कश्मीर राज्य" किंवा नुसतंच "राज्य" म्हणूयात) म्हणजे डोगरा, कश्मीरी, गिलगिती, वाखी, बल्ती, लद्दाखी, पहाडी, गुज्जर अशा अठरापगड लोकसमुहांची खिचडी! त्यातले बहुतांश मुस्लिम, पण तरीही मोठ्या प्रमाणात हिंदू, आणि थोडेसे बौद्ध. बहुधा ते भारतातलं सर्वात वैविध्यपूर्ण राज्य होतं. याचं कारण समजून घ्यायचं असेल तर तिथला भूगोल समजून घ्यायला हवा.

जम्मू-काश्मीर राज्य हे भारतीय उपखंडाचं उत्तर टोक आणि मध्य आशियाचं प्रवेशद्वार. हिमालय, काराकोरम, कुनलुन, पामिर आणि हिंदुकुश या जगातल्या सर्वोच्च पर्वतांनी इथे दाटी केलीय. काही पर्वतरांगा तर इतक्या उत्तुंग की त्या पार करणं केवळ अशक्य. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या दोन्ही बाजूंना अगदी विभिन्न प्रकारच्या संस्कृती बहरत गेल्या. हिमालयाची मुख्य रांग (Greater Himalayas) या राज्याला आरपार चिरून जायची. सहाजिकच त्याच्या अल्याड-पल्याडचे लोक, त्यांच्या भाषा, वंश, धर्म, संस्कृती अगदीच वेगळं होतं.

जम्मू-काश्मीर राज्याच्या सामरिक महत्त्वामुळे (strategic importance) या प्रदेशावर आजूबाजूच्या देशांचा डोळा होता. सहाजिकच इथली माणसं, इथला भूगोल, इतिहास आणि (आंतरराष्ट्रीय) राजकारण याचं समग्र चित्र (Big Picture) बघायला हवं!

इतिहास

1947 साली धर्माच्या भारताची आधारावर फाळणी झाली आणि मोठा पेचप्रसंग उभा राहिला. इथला महाराजा हिंदू डोगरा, पण त्याला स्वतंत्र रहायचं होतं (असा प्रवाद आहे). कश्मीरमधील बहुसंख्य प्रजा मुस्लिम, पण त्यांना पाकिस्तान नको होता. तिकडे गिलगितच्या लोकांना "डोगरा" राजा नको होता. या सगळ्या गोंधळात पाकिस्तानने पठाण टोळीवाल्यांना हाताशी धरलं आणि हल्ला केला. मग महाराजांनी धावतपळत भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला. शेवटी भारत-पाकिस्तान युध्द झालं आणि एका क्षणी ते थांबवलं गेलं. पाकिस्तानने जिंकलेला भाग म्हणजे  POK (Pakistan-occupied Kashmir) आणि युद्ध थांबलं ती रेषा म्हणजे LOC (Line of Control). गेली सात दशकं जवळपास परिस्थिती 'जैसे थे' आहे.

1963 साली तर गंमतच झाली. पाकिस्तानने काराकोरम पर्वताच्या उत्तरेची "शक्सगाम व्हॅली" (Trans Karakoram Tract) परस्पर चीनला देऊन टाकली. यालाच म्हणतात "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!" त्यांनतर मात्र पाकिस्तान आणि चीनचं "अतूट" मैत्रीपर्व सुरू झालं.

1970 साली पाकिस्तानने POK चे दोन तुकडे केले. उत्तर दिशेला, हिमालयाच्या पल्याडचा दूर दराज़ का इलाका म्हणजे "गिलगित-बल्तिस्तान" (GB) आणि अल्याडचा, पंजाबला चिकटून असलेल्या भाग म्हणजे "आझाद जम्मू आणि कश्मीर" (AJK). भारताला अर्थातच हे नाव मान्य नाही!

जम्मू-काश्मीर राज्याच्या पश्चिम आघाडीवर हे सगळं सुरू असतानाच पूर्व आघाडीवर, "अक्साई चिन" भागात वेगळंच नाट्य घडत होतं.

त्याचं असं झालं की स्वातंत्र्यानंतर जरी जम्मू-काश्मीर राज्य तांत्रिकदृष्ट्या भारताचं झालं तरी अक्साई चिनसारख्या परिसरात आपण पोहचलोच नव्हतो. हा प्रदेश अतिदुर्गम, वैराण आणि निर्मनुष्य. कालांतराने आपण तिथे गेल्यावर कळलं की चीनने तिथे एक रस्ताच बांधून टाकलाय!

मग काय, चर्चा, चकमकी आणि शेवटी 1962 सालचं भारत-चीन युद्ध. तेंव्हापासून "अक्साई चिन" भागात "चीन" ठाण मांडून बसलाय. किरकोळ वादविवाद सोडले तर इथली Line of Actual Control (LAC) तशी शांतच असते. पण 2017 साली "दोकलाम प्रश्न" उद्भवला तेंव्हा मात्र LAC "पेटली होती". म्हणजे काय, तर भारत आणि चीन या "अण्वस्त्रधारी महासत्तांच्या" सैनिकांनी लाठ्या-काठ्यांनी हाणामारी केली आणि एकमेकांवर दगडफेक केली! पूर्वी आईन्स्टाईन म्हणाला होता "World War IV will be fought with sticks and stones" बहुधा त्याचीच "प्रॅक्टिस" करत असावेत!!!

अजून एक राहिलंच! भारताच्या ताब्यात असलेल्या भागाच्या उत्तर टोकाला "काराकोरम पास" नावाची खिंड आहे. प्राचीन काळच्या "सिल्क रूट"चा एक फाटा तिथून यारकंद आणि काशगरला जायचा. या खिंडीच्या पश्चिमेला "सियाचिन ग्लेशियर" आहे. हा भाग तसा भयंकरच! इतका दुर्गम की तिथे सर्व्हे करून नकाशे करणंही शक्य नव्हतं.

1972 साली "सिमला अग्रीमेंट" झालं आणि भारत-पाकिस्तानने LOC वर आहे तिथेच थांबायचं आणि चर्चेने प्रश्न सोडवायचा असं ठरलं. पण LOC ठरवताना "सियाचिन ग्लेशियर" तशीच सोडून दिली—कारण नकाशेच नव्हते!

1984 साली भारताला कुणकूण लागली आणि भारताने या "अशक्यप्राय" पर्वतरांगांवर सैन्यच पाठवलं. तेंव्हापासून सियाचिन ग्लेशियर आणि शेजारच्या पर्वतरांगा भारताच्या ताब्यात तर खालचा भाग पाकिस्तानकडे. ना ते वर येऊ शकत, ना आपण खालचा भाग जिंकू शकत. जगातल्या सर्वोच्च युध्दभूमीवरही परिस्थिती "जैसे थे"!

असो! इतिहास पुष्कळ झाला, आता लोकांकडे वळू. त्यापूर्वी AJK (आझाद जम्मू आणि कश्मीर), GB (गिलगित-बल्तिस्तान), Trans Karakoram Tract (किंवा शक्सगाम व्हॅली), Siachen Glacier (सियाचिन हिमनदी), Aksai Chin (अक्साई चिन) ही अवघड नावं मात्र लक्षात ठेवू.

"अल्याडचा" भूगोल

जम्मू-काश्मीर राज्याच्या भूगोल बघितल्याशिवाय इथली माणसं समजणारच नाहीत. आपण दक्षिणेकडून सुरुवात करू... 

पंजाबचं मैदान संपतं आणि हिमालयाच्या "शिवालिक टेकड्या" (Sivalik Hills) सुरु होतात. इथून उत्तर दिशेला "पीर पंजाल" (Lesser Himalayas) रांगांपर्यंत पसरलेला डोंगराळ प्रदेश म्हणजे "जम्मू". इथले बहुतेक लोक हिंदू डोगरा. त्यांची भाषा आणि संस्कृती बरीचशी पंजाबसारखीच. आजूबाजूच्या डोंगरात गुज्जर-बाकरवाल वगैरे लोक राहतात. तिकडे पहाडी, गोजरी अशा भाषा बोलल्या जातात. जम्मू शहर, (पाकव्याप्त कश्मीरमधलं) मिरपूर शहर, वैष्णोदेवी मंदिर हे सगळं याच भागातलं.

पीर पंजाल पहाड चढून गेलं की "कश्मीर" येतं. झेलम नदीचं हे खोरं उत्तरेला "हिमालय" पर्वतापर्यंत (Greater Himalayas) पसरलंय. इथले कश्मीरी लोक बहुतांशी मुस्लिम. अर्थात भट्ट, कौल, रैना, खेमू, सप्रू, बांगरू, नेहरू, कोटरू, गुर्टू, मट्टू, टपलू असे (गंमतीदार आडनावांचे) कश्मीरी पंडितही इथलेच! हिंदू असो किंवा मुस्लिम, इथल्या लोकांची भाषा "कश्मीरी (किंवा कोशूर)".

कश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेला "किशनगंगा" नदीकिनारी "शारदा पीठ" होतं. आता ते उध्वस्त झालंय. शिवाय पाकिस्तानव्याप्त भागात असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष कोण देणार? असो. या किशनगंगेच्याच जवळपास "मुझफ्फराबाद" हे शहर आहे. पाकिस्तान त्याला "आझाद कश्मीरची" राजधानी म्हणतं. "त्यांच्याकडे" 370 वं कलम नसल्याने इथे पंजाबी आणि पख्तुन (पठाण) लोकांची संख्या वाढत गेली. या परिसरात आता पंजाबी, पश्तू, हिंदको, पहाडी आणि (थोड्या प्रमाणात!) कश्मीरी भाषा बोलली जाते.

"किशनगंगा" हे नाव न आवडल्याने (!) पाकिस्तानने तिचं "नीलम नदी" असं बारसं केलाय. याच नदीच्या काठाने हिमालयाच्या पल्याड जायचा रस्ता आहे, पण त्याबद्दल नंतर बोलू. आधी अल्याडचं पूर्ण करू.

भारताच्या नवीन नकाशानुसार पंजाबच्या मैदानापासून हिमालय पर्वतापर्यंतचा सर्व प्रदेश म्हणजे "जम्मू आणि कश्मीर केंद्रशासित प्रदेश" (यात AJK सुद्धा येतोच). जरी इथे डोगरा, कश्मीरी असे वेगवेगळे लोक राहात असले तरीही सगळे "आर्य वंशाचे". त्यांच्या भाषाही Indo-Aryan कुळातल्या.

(इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, आणि भारतीय उपखंडातले बरेच लोक हे स्वतःला "आर्य वंशाचे" म्हणवतात. त्यांचं दिसणं, त्यांच्या भाषा, मौखिक परंपरा, लोककथा, आख्यायिका यात काहीतरी "कनेक्शन" आहे. Caucasoid वगैरे अवघड शब्द वापरण्याऐवजी, मलातरी "आर्य" शब्द सोपा वाटतो, म्हणून वापरला! हे आर्य म्हणजे नक्की कोण, ते इथले का बाहेरचे यावर बरेच वाद आहेत. आपण त्यावर आजतरी बोलूया नको!)

"पल्याडचा" भूगोल

काश्मिरचं सौंदर्य सगळ्यांना माहित असतं. पण हिमालयाच्या पल्याड त्याहीपेक्षा काहीतरी भन्नाट आहे हे फारच कमी जणांना माहित असतं. जेम्स हिल्टनच्या Lost Horizon मधली "शांग्री-ला" तिकडेच आहे म्हणे!

हिमालय ओलांडला की थंड वाळवंट सुरू होतं. उत्तुंग पर्वत, माथ्यावर थोडं हिम आणि खोल खोल दऱ्यांमध्ये जाणारे रखरखीत पण अफलातून उतार. लेह-लद्दाख भागात ज्यांनी प्रवास केला आहे त्यांना हे माहित असेलच. या भागातले लोक दिसायला तिबेटी लोकांसारखे. धर्म बौद्ध आणि भाषा लद्दाखी.

जरा पश्चिमेला, कारगिल भागात आलं की मुस्लिम वस्ती सुरू होते. हे लोकही लद्दाखीच पण त्याच्यात जरा आर्य वंशाची सरमिसळ झाली आहे. हे लोक "बल्ती-पुरगी" भाषा बोलतात. (जवळच्या द्रास भागात "शिना" भाषा बोलतात, पण त्याबद्दल थोडं नंतर.)

कारगिलच्या जवळच LOC आहे ("टायगर हिल" आठवत असेलच!). ती ओलांडली की पाकिस्तानव्याप्त "बल्तिस्तान" येतं. इथले "बल्ती" लोक आणि कारगिलचे "पुरिग" लोक जवळपास सारखेच. एकेकाळचे हे बौद्ध लोक आता शिया आणि नूरबक्षी मुस्लिम पंथांचे आहेत. खरं पाह्यलं तर "स्कर्दू" शहरातली बल्ती, "कारगिल"ची पुरगी आणि "लेह"ची लद्दाखी—तिन्ही भाषा एकाच प्रकारच्या. आणि हो, (धर्म वेगळे असले तरी) लोकही एकाच प्रकारचे!

बल्तिस्तान म्हणजे "जगातला" सर्वाधिक पर्वतमय प्रदेश! इथला Concordia भाग तर अफाट-अचाट असाच म्हणावा लागेल. इथे अगदी हाकेच्या अंतरावर जगातली सर्वोच्च शिखरं आहेत. शिवाय Deosai Plateau सारखं सौंदर्य जगात क्वचितच सापडेल!

बल्तिस्तानच्या उत्तरेला काराकोरम पर्वत आणि दक्षिणेला हिमालय. त्यादरम्यानच्या खोऱ्यातून सिंधू नदी वाहते. ही वायव्यवाहिनी नदी अचानक हिमालयाला वळसा घालून दक्षिणवाहिनी होते. जवळच गिलगित नदीचा संगम होतो, त्यामुळे जणूकाही इंग्लिश Y आकाराचे तीन प्रवाह एकत्र येताना दिसतात. याच Y च्या बेचक्यात जगातले तीन पर्वतही एकत्र येतात—पूर्वेला हिमालय, उत्तरेला काराकोरम आणि पश्चिमेला हिंदुकुश!

इथून उत्तरेचा भाग म्हणजे पाकिस्तानव्याप्त "गिलगित" प्रदेश. हा भाग म्हणजे मध्य आशियाचं प्रवेशद्वार! प्राचीन काळचा "सिल्क रूट" इथल्या काराकोरमच्या दुर्गम रांगांमधूनच जात असे. दक्षिणेला कश्मीर आणि पख्तुन प्रदेश, पूर्वेला बल्तिस्तान, उत्तरेला मध्य आशिया, पश्चिमेला अफगाणिस्तानचा "वाखान" प्रदेश. वस्तूंच्या व्यापाराबरोबर माणसांचीही ये-जा वाढली. त्यामुळेच इथल्या (मुख्यतः आर्य वंशाच्या) लोकांवर तिबेटी आणि मध्य आशियाची छाप दिसते!

गिलगित शहराजवळ बोलली जाणारी "शिना" भाषा ऋग्वेदकालीन संस्कृतच्या बरीच जवळची आहे म्हणे! प्राचीन काळी (कदाचित) इंद्र-वरुणाची उपासना करणारे इथले लोक मध्यकालात बौद्ध होते. आता मात्र इथले लोक शिया, नूरबक्षी, आगाखान संप्रदायाच्या मुस्लिम धर्माचे आहेत.

पूर्वीच्या "सिल्क रूट"चं नवं रूप म्हणजे चीनने बांधलेला "काराकोरम हायवे"! गिलगितहून चीनकडे जाताना रस्त्यात "हुंझा व्हॅली" येते. अप्रतिम सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातच कुठेतरी "शांग्री-ला" आहे म्हणतात! इथले "बुरुशो" लोक शतायुषी असतात अशी वदंता आहे, तर कुणी म्हणतात की ते अलेक्झांडरबरोबर आलेल्या ग्रीकांचे वंशज आहेत!

हुंझाच्या वरच्या भागात "वाखी" लोक राहतात. "पामिर" पर्वताच्या कुशीत राहणाऱ्या या लोकांची भाषा शेजारच्या अफगाणिस्तानातल्या दारी भाषेसारखी.

भारताच्या नवीन नकाशानुसार हिमालयाच्या पल्याडच्या, अगदी काराकोरमच्या उत्तरेच्या "शक्सगाम व्हॅली"पर्यंतचा, सर्व प्रदेश म्हणजे "लद्दाख केंद्रशासित प्रदेश" (यात पाकिस्तानव्याप्त गिलगित-बल्तिस्तानसुद्धा येतो).

हिमालयाच्या पल्याडचा सगळाच प्रदेश भन्नाट आहेत. इथले रांगडे पहाड, हिमनद्या, सिंधू नदी, देवसाई पठार आणि हुंझा-नगरसारखी खोरी, सगळं सगळं जगावेगळं आहे.  काही जणांच्या मते कश्मीरपेक्षा अनेक पटीने सुंदर!

पण हिमालयाच्या अल्याड-पल्याड दोन्ही बाजू बघितलेले लोक असतील तरी किती? आपल्याला (भारतीयांना) "तिकडे" जायची संधी कधी मिळणार? कुणास ठाऊक!

पण अशक्य काहीच नसतं. कुछ भी हो सकता है!!!

लेखक: संतोष देशपांडे (dsantosh1972@gmail.com)

संपादन:

3 नोव्हेंबर 2019: लेखन/प्रकाशन 

Wednesday, March 13, 2019

सिक्कीम: "विशलिस्ट"

खरं तर सिक्कीममध्ये कितीतरी अनवट ठिकाणं आहेत—त्यातली काही बघितली, काही राहून गेली. ती आता माझ्या विशलिस्टमध्ये लिहून ठेवलेली आहेत, तीच शेअर करतोय!

सिल्क रूट 

प्राचीन काळी चीनचा जगाशी ज्या मार्गाने व्यापार चाले त्याला 'सिल्क रूट' म्हणतात. चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे चहा, चिनी माती आणि अर्थातच, रेशीम! भारताने एक महत्वाची गोष्ट निर्यात केली, ती म्हणजे बौद्ध तत्वज्ञान!

पूर्व सिक्कीमच्या नथुला आणि जेलेपला या खिंडी म्हणजे सिल्क रूटची भारतातील प्रवेशद्वारे. त्यापैकी नथुला खिंड बघता येते, पण जेलेपला नाही. पण या खिंडींकडे जाणारा मार्ग "सिल्क रूट" म्हणून प्रसिद्ध आहे.

सिल्क रूटच्या बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी परमिट लागतं. त्याची आपल्या ट्रॅव्हल एजन्टतर्फे सोय करून ठेवलेली बरी. सिल्क रूटची बरीच ठिकाणं हाय आल्टीट्यूडवर आहेत, त्यामुळे विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सिल्क रूटला जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सिल्क रूटला अनेक प्रकारे जाता येतं, पण साधारणपणे प्रवासाची रूपरेषा खालीलप्रमाणे:
सिलिगुडी - कालिंपोंग - झुलुक - कुपूप - बाबा हरभजन सिंग बंकर (Old Baba Mandir) - बाबा मंदिर (New Baba Mandir) - नथुला - चांगु लेक - गँगटोक



झीरो पॉईंट ते त्सो लामो लेक 

युमसामदोन्ग, अर्थात झीरो पॉइंटला रस्ता संपतो आणि पहाड सुरु होतात. पण नीट बघितलं तर तिथूनही पुढे एक पायवाट जाते, ती थेट त्सो लामो लेकपाशीच पोचते!

झीरो पॉईंट याचा अर्थ रस्त्याचा शेवट. अर्थातच गाड्या जाऊ शकतील असा रस्ता नाहीच, पण हा दुर्गम मार्ग बर्फातून जात-जात दोन्गका ला (Donghka La) या खिंडीपर्यंत जातो. अवघड चढण आणि भन्नाट वाऱ्याला तोंड देत ही खिंड पार केली की पुढे तिबेटचं पठार! सपाट, वैराण आणि अतिथंड. "थोडंसच" पुढे गेलं की भारतातलं सर्वोच्च सरोवर "त्सो लामो" (Tso Lhamo किंवा Cholamu Lake) लागतं. इथून जवळच गुरुदोंगमार लेक.

हा "रस्ता" दुर्गम तर आहेच, पण तिबेटच्या सीमेजवळचा. त्यामुळे इथे यायचं परमिट मिळणंही दुरापास्त. बघूया कधी योग येतोय ते!



Tuesday, March 5, 2019

सिक्कीम: लाचुंग-युमथांग

तुम्ही The Sound of Music हा सिनेमा बघितला आहे का? त्याच्यातलं साल्झबर्ग गाव आठवतंय? एक उंच पर्वतकडा, त्याच्या माथ्यावर बर्फाची टोपी, पायथ्याशी चिमुकलं गाव, सभोवती हिमशिखरं—अगदी तस्साच आहे लाचुंग परिसर! अगदी चित्रातल्यासारखा!

लाचेनहून निघून चुंगथांग गाठायचं आणि उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे जाऊन लाचुंग. पोचल्यावर परत एकदा वरण-भात, बटाट्याची भाजी असं फक्कड (!) जेवायचं आणि रात्री लवकर झोपी जायचं. तशी काल रात्री फारशी झोप झालेलीच नाहीय. दुसऱ्या दिवशी सिक्किममधला सर्वात सुंदर भाग बघायला जायचंय!

सकाळी आन्हिकं उरकायची आणि निघायचं. पहाडात चढताना थोड्याच वेळात रस्त्यावर शिवाजी महाराजांचा फोटो, संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिलेल्या पाट्या दिसतात. "अरे, हे इथे कुठे?" असा विचार मनात येइपर्यंत Maratha Light Infantryची पाटी दिसते आणि समोरच आपले मराठमोळे जवान! त्यांना भेटल्यावर त्यांना आणि आपल्याला, दोघांनाही, माहेरचं माणूस भेटल्यासारखं वाटतं!

आता खडी चढण सुरु होते. एकीकडे एक उत्तुंग हिमकडा आपली साथ देत असतो आणि अचानक चहूकडे ऱ्होडोडेंड्रॉन्सचं 'जंगल' लागतं. चार-पाच फूट उंचीची झुडपं, त्यावर लागलेली लाल भडक फुलं आणि आसमंतात पसरलेला मादक गंध! इतका भडक लाल रंग कदाचित आपण प्रथमच पाहात असतो!

या Shingba Rhododendron Sanctuaryमध्ये कितीही मोह झाला तरी फुलांना हात लावायचा नाही, कुणी बघितलं तर मोठा दंड भरावा लागेल! पण इतक्या सुंदर नजाऱ्याचे फोटो मात्र जरूर काढायला हवेत—भडक फुलांचं जंगल, चहुबाजूनी हिमशिखरे, पाठीमागे हिमकडा. क्या बात है!

थोडं अजून पुढे गेलं की याकचे आणि झिपऱ्या घोड्यांचे कळप दिसू लागतात. कधीतरी त्यांच्याबरोबर भलंमोठं तिबेटन मॅस्टिफ जातीचं कुत्रं लक्ष वेधून घेतं.

आता आपण एका 'विचित्र' ठिकाणी पोचतो. एका बाजूला ढासळलेला कडा, दुसरीकडे आडवे झालेले सूचिपर्णी वृक्ष, मध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेला रस्ता—एखाद्या भयपटात शोभावी अशी जागा! 2011 सालच्या भूकंपाचं एपिसेन्टर इथेच होतं म्हणे!

या भीषण आणि विद्रुप ठिकाणाहून पुढे गेल्यावर मात्र आपण एका स्वप्ननगरीत येऊन पोचतो. हीच ती युमथांग व्हॅली—सिक्किममधलं सर्वात सुंदर ठिकाण! एका बाजूला उत्तुंग हिमशिखरं, दुसरीकडे घनदाट जंगल असलेला डोंगर आणि त्यांच्या दरम्यान बशीसारखी पसरट युमथांग व्हॅली.

व्हॅलीच्या एका बाजूने रस्ता जातो तर दुसऱ्या बाजूने एक उथळ नदी. आणि या दोहोंच्या दरम्यान पसरलेलं प्रचंड मोठं कुरण. इथली गंमत म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून हे कुरण छोट्या रानफुलांनी भरून जातं! पुढच्या आठवड्यात ही फुलं सुकतात आणि दुसऱ्या प्रकारची फुलं फुलतात. जूनपर्यंत हा खेळ सुरु असतो! ही सिक्कीमची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स डोळ्यांचं पारणं फेडते. खरं तर इथे निवांत वेळ काढायला हवा. अफाट कुरण आणि त्यावर चरणारे याक, फोटो तो बनता है! पण हा आनंद अर्ध्यावरच ठेवून आता पुढे निघायला हवं, कारण आता आपल्याला बर्फात खेळायला जायचंय!

युमसामदोन्ग (Yumesamdong) हे यापुढचं शेवटचं ठिकाण. यापुढे रस्ता नाही, म्हणून याला झीरो पॉईंट म्हणतात. युमथांग व्हॅली सोडून पुढे निघालं की हळूहळू झाडं-झुडपं विरळ होत जातात. वाट उंच चढत जाते आणि सगळीकडे रखरखाट पसरतो. उभे पहाड, खोल काळ्याकुट्ट दऱ्या आणि खडी चढण चढता चढता अचानक स्नो लाईन लागते आणि चमत्कार होतो. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फच-बर्फ! डोळे दिपून जातत. बर्फातून वाट काढत आपण एका सपाटीवर येतो आणि रस्ता संपतो—हाच तो झीरो पॉईंट!

चहूकडे बर्फ, त्यातून गेलेला रस्ता, शेजारी अनेक ठेले आणि त्यावर भुट्टा, चणे, मॅगी, मोमो आणि दारू (!) विकणारे भुटिया लोक. पलीकडच्या बर्फ़ातूनच एक छोटासा झरा वाहतो, त्यावर एक पूल आणि त्यापलीकडे बर्फाची टेकडी. खेळा लेको किती बर्फ खेळायचं ते!

बर्फात खेळून कंटाळलं की परतायचं, त्याच रुद्रभीषण मार्गावरून खाली उतरायचं, युमथांग व्हॅलीमध्ये कुरणावर मस्त लोळायचं आणि संध्याकाळच्या आत परत लाचुंगला.

लाचुंगचा बौद्धमठ (Lachung Monestry) बघण्यासारखी आहे. तिथे भेट द्यायची आणि रात्री परत हॉटेलवर. उत्तर सिक्कीमची स्वप्नातली दुनिया सोडून उद्या आपल्याला परत गँगटोकला जायचंय.

लाचुंग परिसरात बघायची ठिकाणे 

लाचुंगचा बौद्धमठ (Lachung Monestry)
Shingba Rhododendron Sanctuary
युमथांग व्हॅली
युमथांग हॉट स्प्रिंग्स
युमसामदोन्ग, अर्थात झीरो पॉईंट



Monday, March 4, 2019

सिक्कीम: गुरुदोंगमार लेक

भारतात खूप कमी ठिकाणं आहेत जिथे आपण (भारतात राहून) साक्षात हिमालय ओलांडू शकतो, गुरुदोंगमार लेक त्यापैकी एक! सिक्कीमच्या उत्तरेला हिमालय ओलांडून जायला एक फट आहे, तिथून आपण थेट तिबेटच्या पठारावर जाऊ शकतो. तिथेच आहेत भारतातली अति-उंचीवरची दोन सरोवरं: त्सो लामो लेक (Tso Lhamo Lake) आणि गुरुदोंगमार लेक (Gurudongmar Lake).

गुरुदोंगमार लेक समुद्रसपाटीपासून 5183 मीटर, म्हणजेच 17000 फुटांवर आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी, विरळ हवा आणि लहरी हवामान. दुपारी बारानंतर इथे रोज वादळ होतं, त्यामुळे अर्थातच लवकरात लवकर इथे जाऊन सुखरूप परत यायचं!

हे सरोवर तिबेटच्या (चीनच्या) सीमेपासून चार-पाच किलोमीटरवर आहे. त्यामुळे अर्थातच गुरुदोंगमार लेकला जायला स्वतंत्र परमिट लागतं. पण आपल्या ट्रॅव्हल एजंटने सगळी तयारी आधीच केल्यामुळे आपलं काम सकाळी लवकरात लवकर निघायचं.

दुपारच्या वादळाच्या आत परतायचं असल्यामुळे लवकरच निघावं लागतं. शिवाय वेगात चढत गेल्यावर विरळ हवेचा त्रास (altitude sickness) जास्त होतो, त्यामुळे शक्य तेवढं सावकाश चढायचं. पहाटे चारच्या आत चढाई सुरु व्हायला हवी.

पहाटे लवकर निघाल्यामुळे कदाचित नाश्ता झालेला नसतो, पण आपल्याजवळ तहानलाडू-भूकलाडू असलेले केव्हाही उत्तम. भरपूर पाणी प्यायल्यावर (आणि लघुशंका केल्यावर) आल्टीट्यूड सिकनेसचा त्रास कमी होतो. त्यामुळे भरपूर पाणी जवळ ठेवावं (आणि कडाक्याच्या थंडीत इच्छा नसली तरी) पीत राहावं! अर्थात अशा दुर्गम ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची शहानिशा डॉक्टरकडून आधीच करून घेतलेली बरी.

भल्या पहाटे लाचेन सोडल्यावर आपली जीप रस्त्यासारख्या दिसणाऱ्या (!) वाटेने चढू लागते. हाडं खिळखिळी करत आणि काळजाचा ठोका चुकवत खडी चढण सुरु होते. बाजूचं घनदाट जंगल हळूहळू बदलू लागतं. सूचिपर्णी वृक्षांच्या जागी खुरटी ऱ्होडोडेंड्रॉन्स दिसू लागतात आणि पहाता-पहाता निसर्ग बदलतो.

आता सगळीकडे रखरखाट दिसू लागतो. आजूबाजूला उघडे डोंगर आणि त्यावर तुरळक बर्फ, म्हणजे आता आपण स्नो-लाईन ओलांडली असते! त्याच्याही पल्याड उंचच-उंच हिमाच्छादित पर्वतशिखरं हळूच डोकावू लागतात आणि आपण 'थांगू' नावाच्या खेड्यात पोचतो.

थंडी 'मी' म्हणत असते, भन्नाट वारं वहात असतं. कसाबसा जीव सांभाळत आपण एका खोपट्यात शिरतो आणि त्या 'हॉटेल'ची मालकीण, एक भुटिया म्हातारी, आपलं स्वागत करते!

मोमो, मॅगी, गरम चहा, हवी असल्यास दारू (व्हिस्की, ब्रँडी, इत्यादी) असा भरगच्च मेनू आपल्यासाठी तयारच असतो. खायचं प्यायचं आणि सुटायचं! (एक महत्वाची सूचना: कितीही मोह झाला तरी हाय-आल्टीट्यूडला मद्यपान टाळावेच. विरळ हवेचा त्रास जास्त होतो.)

हॉटेलमध्ये नाश्ता (!) करून निघाल्यावर आपली गाडी आता वेग घेते. चढण आता कमी झालेली असते आणि बऱ्यापैकी सपाटीवरून आपली गाडी धावत असते. मनुष्यवस्तीचं शेवटचं ठिकाण म्हणजे 'थांगू'. आता यापुढे रस्त्यात फक्त तुरळक याकचे कळप, त्याबरोबर एखादं 'तिबेटन मॅस्टिफ' जातीचं भलंमोठं कुत्रं आणि दऱ्याखोऱ्यात दडलेले सैनिकांचे सुसज्ज बंकर्स! हां, एक सांगायचं राहिलंच. लवकरच एक चांगलं हॉटेल येणार आहे!!!

बरोब्बर पंधरा हजार फूट उंचीवर लष्कराचं ठाणं आहे. काही लष्कराच्या गाड्या, बराकी आणि त्यातच एक कामचलाऊ हॉस्पिटलसुद्धा आहे! तिथे लष्कराचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. कुठलाही त्रास होत असेल तर प्रथमोपचार करून, गरज असेल तर, पेशंटला कमी उंचीवर पाठवलं जातं. आणि या हॉस्पिटलसमोरच आहे Cafe 15000, जगातलं सर्वाधिक उंचीवरचं हॉटेल!

कॅफे 15000मध्येही जवळपास तेच पदार्थ मिळतात: मॅगी, मोमो, सामोसे आणि कांदाभजीसुद्धा! इथे रॉकेलच्या हीटरशेजारी बसून बसून गरमगारम भजी खायची मजा वेगळीच! खरंतर हेसुद्धा एक छोटंसं खोपटंच. दोन बाकडी, एक हीटर, एक काउंटर आणि छोट्याश्या देव्हाऱ्यात बाबा हरभजनसिंगचा फोटो!

इथले सैनिक मात्र खूप प्रेमळ! हसतमुख आणि मदतीला तयार. एखादा सातारा-कोल्हापूरकडचा असेल तर आपल्या भज्यांचे पैसेही तोच भरणार! आपल्याबरोबर लहान मूल असेल तर त्यांच्यातलं कुणीतरी चॉकलेट देणार. अशा खडतर ठिकाणी सैनिकांच्या नुसत्या दर्शनानेही आपल्याला आधार वाटतो!

भरपेट नाश्ता केल्यावर आपली गाडी सुसाट निघते. एव्हाना आपण भारतीय उपखंड ओलांडून, हिमालयाच्याही पलीकडे, तिबेटच्या पठारावर आलेलो असतो. यापुढे जवळपास सपाट आणि डांबरी सडक. त्यामुळे बघता-बघता आपण एका टेकडीपाशी येतो. समोरचा रस्ता "त्सो लामो लेक"ला जातो. भारतातलं ते सर्वोच्च सरोवर, पण तिथे जायचा परवाना मिळणं अवघड. पण इथे तर आपण भारतातल्या दुसऱ्या उंच सरोवरापाशी पोचलोय. गाडी एक छोटीशी चढण चढते आणि आपोआपच "अहा!" असे उद्गार बाहेर पडतात! समोर साक्षात गुरुदोंगमार लेक दिसतं.

समोर हिमाच्छादित पर्वत, त्यातून येणारी हिमनदी या निळ्या-पांढऱ्या सरोवरात अलगद उतरते. बहुतेक सरोवर गोठलेलं, पण एका भागात मात्र स्वच्छ पाणी. गुरु रिम्पोचे, अर्थात गुरु पद्मसंभवांनी स्पर्श केल्यामुळे सरोवराचा हा भाग हिवाळ्यातही गोठत नाही म्हणतात.

गाडीतून उतरताना मात्र जपून! विरळ हवेची कल्पना खाली उतरल्यावरच येते. एकेक पाऊल टाकणंही मुश्किल, सरोवरापाशी खाली उतरायचा विचार न केलेलाच बरा! सावकाश चालत, दम खात शेजारच्या 'सर्व धर्म स्थल' या मंदिराला भेट द्यायची आणि तडक परतीचा रस्ता धरायचा. माध्यान्हीच्या आधी इथून खाली उतरायला हवं!

परतीच्या मार्गावर 'चोपता व्हॅली'चे फोटो काढायचे आणि लाचेनला पोचायचं. आपल्याला आजच लाचुंगला पोचायचं आहे. (टीप: 'चोपता व्हॅली' नावाचं अजून एक ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे!)

गुरुदोंगमार लेकला जाताना बघायची ठिकाणे

थांगू व्हॅली
15000 कॅफे
गुरुदोंगमार लेक
चोपता व्हॅली


सिक्कीम: उत्तर सिक्कीम

गँगटोक सोडून आपण उत्तरेकडे निघालो की माणसं दिशेनाशी होतात आणि जंगलं सुरु होतात! जसजसं उत्तरेला जाऊ तसे रुंदपर्णी वृक्ष कमी होऊन सूचिपर्णी वृक्ष दिसू लागतात. आजूबाजूला खड्या पर्वतरांगा, त्यावर घनदाट वृक्षराजी, कुठे तुटलेला कडा  तर कुठे त्यावरून कोसळणारा धबधबा आणि त्याही पलीकडे दिसणारी हिमाच्छादित शिखरं! उत्तर सिक्कीम ही एक वेगळीच दुनिया आहे. तीन बाजूंनी उत्तुंग पर्वतरांगा आणि मधल्या बेचक्यात वसलेली लेपचा लोकांची छोटी खेडी. मनुष्यवस्ती तशी विरळच, कारण घर बांधायला सपाट जागा तर हवी ना!

या जिल्ह्याच्या दोन्ही बाजूंनी लगट करणारा चिनी ड्रॅगन तर तिसऱ्या, नेपाळच्या, बाजूला कांचनजंगावर वास्तव्य करणारी झोन्गा देवता अश्या आंतर्राष्ट्रीय शेजारामुळे उत्तर सिक्कीमला येण्यासाठी परमिट लागतं. पण आपल्या ट्रॅव्हल एजन्टने आधीच सगळी तयारी केलेली असते. त्यामुळे मंगन, रंगरंग अशा रस्त्यात येणाऱ्या चेकपोस्ट्सना आपली कागदपत्रं दिली जातात आणि आपण पुढे जातो.

आता मात्र रस्ता कठीण होऊ लागतो. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं अस्तित्वच नसतं. जेंव्हा आपला ड्रायव्हर धबधब्यातून येणारं पाणी  जिथे दरीत उडी घेतं त्या (वाहून गेलेल्या) रस्त्यातून आपली गाडी घालतो तिथे मात्र काळजाचा ठोका चुकतो! एकीकडे उंच डोंगर, दरीमध्ये वाहणारी तीस्ता नदी. क्वचितप्रसंगी आपल्याला खोल दरीतून येणारी खळखळही ऐकू येते तर कधी दोन डोंगरांच्या फटीतून कांचनजंगा दर्शन देतं!

कडेकपारीतून दिवसभर प्रवास करून आपण चुंगथांगला येऊन पोचतो. इथे दोन रस्ते फुटतात: एक लाचुंगला जातो तर दुसरा लाचेनला. आपण डावीकडचा रस्ता धरतो आणि चढत-चढत लाचेन (अर्थात, मोठी खिंड) या छोट्याश्या वस्तीवर येऊन पोचतो.

लाचेनच्या भन्नाट वाऱ्याला आणि कडाक्याच्या थंडीला तोंड देत कसंबसं सामान टाकायचं आणि जेवायची तयारी करायची. जेवण तरी कुठलं? वरण -भात आणि बटाट्याची भाजी. पण कुठलीही तक्रार न करता लवकरात लवकर झोपायला हवं कारण उद्या आपल्याला पहाटे उठून जगावेगळ्या गुरुदोंगमार लेकला जायचं आहे!

लाचेनला जाताना बघायची ठिकाणे 

सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल्स
कांचनजंगा व्ह्यू पॉईंट


सिक्कीम: नथुला

सिक्कीमच्या पूर्वेकडे हिमालयायची उंचच उंच रांग आहे. त्याच रांगेत एका ठिकाणी आहे 'नथुला'. तिबेटी भाषेत 'ला' म्हणजे खिंड. अर्थात, ही 'नथु' खिंड! प्राचीन काळी भारत-चीन व्यापार याच खिंडीतून चाले. जगप्रसिद्ध 'सिल्क रूट'चा एक फाटा इथूनच जायचा. अलीकडे सिक्कीम (भारत) तर पलीकडे खोलगट चुंबी व्हॅली (तिबेट, चीन). त्याच्याही पलीकडे उंचावर दिसणारा भूटान! सामरिकदृष्ट्या अत्यंत नाजूक प्रदेश.

'नथुला'ला जायला परमिट लागतं. आपला ट्रॅव्हल एजन्ट किंवा हॉटेलवालाही त्यासाठी मदत करू शकतो. आधीच तयार ठेवलेल्या फोटोचा इथे उपयोग होतो.

हा प्रदेश अतिउंचीवरचा. त्यामुळे थंडीबरोबरच विरळ हवेचा त्रास. त्यामुळे इथे येण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा

नाथूलासाठी सकाळी लवकर निघायचं, कारण पुन्हा एकदा वाहनांच्या रांगा! गँगटोकजवळचं चेकपोस्ट ओलांडलं की रस्ता एकदम चढायला लागतो. तीव्र उतार आणि धोकादायक वळणं पार करून आपण 'छांगू लेक'पाशी (Changu Lake किंवा Tsomgo Lake) पोचतो. आजूबाजूचे हिमाच्छादित पहाड आणि समोरचं निळंशार सरोवर! समोरच्या हिमनदीहून येणारं बर्फगार वारं झेलत आपण याकच्या पाठीवर बसायची संधी थोडीच सोडणार?

मनसोक्त 'याक राईड' झाल्यावर आपली गाडी वळते चीनच्या दिशेने, अर्थात नथुलाकडे. चढ वाढत जातो आणि आजूबाजूला बर्फच बर्फ दिसू लागतं. लवकरच दूरवर सैनिकांच्या हालचाली दिसू लागतात आणि आपण नथुलाला पोचतो!

बर्फाळलेल्या पायऱ्या चढत आपण सीमेपाशी पोचतो. एकीकडे भारत तर फूटभर पलीकडे चीन, आणि त्यामध्ये साधं तारेचं कुंपण! बाजूलाच एक सामाईक चौक, जिथे दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांच्या 'फ्लॅग मिटींग्स' होतात. (आणि आठवणीने एक खुर्ची बाबा हरभजनसिंगसाठी रिकामी ठेवली जाते!) इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत, भन्नाट वाऱ्यात आपले सैनिक कसे रहात असतील ते बाबा हरभजनसिंगच जाणो!

नथुलाच्या पायऱ्या उतरून गाडीत बसलो की आपला मोर्चा वळतो बाबा हरभजनसिंगाच्या समाधीकडे. बाबाचं मूळ मंदिर आहे त्याच्या बंकरमध्ये. पण ते ठिकाण दुर्गम असल्याने लष्कराने जवळच त्याचं मंदिर बांधलंय. "बाबा नवसाला पावतो" अशी सगळ्यांची धारणा आहे, वाटलं तर आपणही अनुभव घेऊन बघू!

नाथूलाचं हवामान बेभरंवशाचं. कधी हिमवादळ येईल किंवा दरड कोसळेल याचा भरवसा नाही. याच्या पुढचा उत्तर सिक्कीमचा प्रवास तर अधिक खडतर, त्यामुळे घरी सुखरूप परत जाईपर्यंत 'बाबा'चा धावा करायला पर्याय नाही!

नाथुलाला बघायची ठिकाणे 

छांगु लेक (याक राईड)
नथुला
बाबा हरभजनसिग मंदिर
बाबा हरभजनसिंग बंकर (हे खूप दूर आहे)

सिक्कीम: गॅंगटोक

गॅंगटोकचा पहिला अनुभव म्हणजे वाहनांच्या लांबच लांब रांगा! सगळीकडे चढ-उतार आणि रस्ते अरुंद, त्यामुळे ट्रॅफिक जॅम तर पाचवीलाच पुजलेला. पण कुठेही गोंधळ नाही, नियमांचं उल्लंघन नाही, अगदी हॉर्नचा आवाजही नाही! सगळीकडे स्वच्छता आणि प्लॅस्टिकचा मागमूसही नाही, त्यामुळे सिक्कीम पाहताक्षणी मनात भरतं.

हॉटेलमध्ये चेक-इन झाल्यावर आपण 'गँगटोक दर्शन' सुरु करतो. गणेश टोक हे एका कड्यावरचं सुंदर मंदिर. कठड्यापाशी उभं राहून शहराचा नजारा बघत राहावा. हनुमान टोक तर त्याच्याहून उंचावरचं मंदिर. इथे तर बऱ्याचदा धुकं असतं.

सिक्कीमचा बराचसा भाग म्हणजे पूर्व हिमालयातलं सदाहरित जंगल. म्हणजे ऑर्किड्सचं नंदनवन! गँगटोकच्या ऑर्किड गार्डनमध्ये जाऊन त्याची झलक तर बघायलाच हवी. तऱ्हेतऱ्हेची फुलं, झाडं यांनी गच्च भरलेली बाग, त्यातले काही प्रकार विकतही मिळतात. किंमत मात्र विचारू नका!

संध्याकाळ मात्र 'एम् जी मार्गा'साठी राखून ठेवायची. गांधीजींच्या पुतळ्यापासून सुरु झालेला हा 'वॉकिंग प्लाझा' म्हणजे शॉपर्सची मक्का. भरपूर दुकानं, ठेले, झाडं, बसायच्या जागा आणि कुठल्याही प्रगत देशाच्या तोडीची स्वच्छता!

दिवसभराच्या दगदगीनंतर आपण हॉटेलमध्ये परत येतो. उद्याचा दिवस मुद्दामच निवांत ठेवलेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी रुमटेक मॉनेस्ट्रीला भेट द्यायची. गॅंगटोक शहराशेजारच्या टेकडीवर वसलेला हा मठ म्हणजे कर्मापा लामांचं महत्वाचं ठाणं. मठातली सुंदर बुद्धमूर्ती, समोरचं विस्तीर्ण पटांगण आणि पूर्वेला दिसणारी हिमाच्छादित शिखरं. क्या नजारा है!

परतीच्या वाटेवर 'रोप वे'मध्ये बसून घ्यायचं आणि परत जाताना झू बघायचा. हे सगळं प्लँनिंग करताना ट्रॅफिक जॅममध्ये जाणारा वेळ विचारात घ्यायलाच हवा! कारण उद्या लवकर उठून आपल्याला चीनच्या सीमेवर 'नथुला'ला जायचंय!

गॅंगटोकमध्ये बघायची ठिकाणे:

गणेश टोक
हनुमान टोक
ऑर्किड शो / फ्लॉवर एक्सिबिशन सेंटर
ताशी व्ह्यू पॉईंट
बांझकरी वॉटरफॉल्स
एम जी मार्ग
लाल बझार
गॅंगटोक रोपवे
गंगटोक झू (Himalayan Zoological Park)
रुमटेक मोनेस्ट्री